सुनंदाबाई घरत यांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत
घटनेला दोन वर्षे उलटूनही आरोपींचा थांगपत्ता नाही

उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यात दि. 17 मे 2021 रोजी तोक्ते वादळ झाले होते. या दिवशी सकाळी 9 ते 9:30 दरम्यान उरण शहरातील गणपती चौक मधील राममंदिर येथे चालू असलेले राम मंदिराच्या कामामुळे, या मंदिरावर कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने त्यावरच्या मजल्यावर रचून ठेवलेले सिमेंटचे विटाचे ब्लॉक अचानक खाली पडून भाजी विक्रेते महिला सुनंदाबाई भीमनाथ घरत व नीता नाईक या उरणमधील दोन महिलांचा या घटनेमुळे दुर्दैवी अंत झाला. राम मंदिरा बांधकाम करताना कोणतेही सुरक्षा व्यवस्था नसल्याने मंदिराचे भिंत अंगावर पडल्याने सदर महिलांचा मृत्यू झाला. 17 मे 2023 रोजी या घटनेला 2 वर्षे पूर्ण झाले. मात्र अद्यापही पोलीस यंत्रणेकडून कोणतेही हालचाल झाली नाही. या घटनेला दोन वर्षे उलटून गेली तरी पण चार्जशीट दाखल झाली नाही. कोर्टात याविषयी माहिती पण पोलीस यंत्रणा देत नाही. त्यामुळे हे प्रकरण दडपले गेले असल्याचा आरोप कुटुंबियांच्या नातेवाईकांनी केला आहे.
आरोपी अजूनही मोकाटच फिरत असल्याने मृतांच्या नातेवाईकांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. स्व. सुनंदाबाई भीमनाथ घरत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी उरण मधील सामाजिक कार्यकर्ते व सुनंदाबाई घरत यांचे पुत्र चंद्रकांत भीमनाथ घरत व घरत कुटुंबियांनी केली आहे.
या घटनेतील जबाबदार व्यक्तीस अजूनही अटक न झाल्याने व घरत कुटुंबियांना न्याय न मिळाल्याने घरत कुटुंबीय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.



