मच्छीमारांच्या विकासासाठी राज्यातील महायुती सरकार कटीबद्ध : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

- रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन ; उद्योग मंत्री उदय सामान्य यांची उपस्थिती
रत्नागिरी : किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे महायुती सरकारचे ध्येय असून यासाठीच रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अनेक वर्ष जुन्या अतिक्रमणाना हटवून आज येथे विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ही कामे वेळेत पूर्ण होतील, असे सांगून येथील मच्छिमांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार आणि मत्स्य विभाग कटिबद्ध असून भविष्यात येथे विविध विकासकामे करून मिरकरवाडा हे बंदर राज्यातील सक्षम बंदर बनविले जाईल, असा विश्वास राज्याचे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिला.

मिरकरवाडा बंदराच्या टप्पा-२ अंतर्गत लिलाव गृह, जाळी विणकाम गृह, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत, अस्तित्वात असलेल्या जेट्टीचे सक्षमीकरण, पाण्याची टाकी, प्रसाधनगृह, काँक्रिटीकरण जाण्या-येण्याकरीता रस्ते, उत्तरेकडील ब्रेकवॉटरचे टॉप काँक्रिट रक्कम अशी रु.२२.४३ कोटी इतक्या निधीतून होणाऱ्या कामांचा भूमीपूजन समारंभ रविवारी पार पडला.



